सत्ता विनयेन शोभते!

तीन महिन्यांपूर्वीच भारतामधे सत्ताबदल झाला. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं (खरं म्हणजे भाजपचं च) सरकार स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेवर आलं. गेल्या बऱ्याच वर्षात एखाद्या पक्षाची एकहाती सत्ता येण्याची ही पहिलीच वेळ! त्यामुळे coalition government च्या कटू अपरिहार्यता बाजूला ठेवून मोदी सरकारचा कारभार वेगवान आणि स्थिर असणार अशी सर्वांची साहजिकच अपेक्षा आहे.
           परंतु गेल्या काही दिवसातल्या घटना या स्पष्ट बहुमताची काळी बाजू असल्यासारख्या घडलेल्या दिसतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहीर 'सरकारी' कार्यक्रमात, आधी हरियाणा मधे आणि नंतर महाराष्ट्रामधे, त्या त्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची हुर्यो उडवली गेली. पहिली गोष्ट म्हणजे हे कार्यक्रम सरकारी होते. विकासकामांचं भूमीपूजन/उद्घाटन अशा स्वरूपाचे होते. मोदी यांच्या पक्षाची जाहिर सभा वगैरे नव्हती. या प्रसंगी भाजपा कार्यकर्त्यांनी (महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी चिथावणी देणारे कार्यकर्ते भाजपचेच होते हे स्पष्ट सांगितले आहे.) आपल्या राजकीय अपरिपक्वतेचे दर्शन घडवणे योग्य नव्हते. मुख्यमंत्रीपद हे एक घटनात्मक पद आहे आणि लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींचे नेतृत्व या पदावरची व्यक्ती करत असते. आपल्याच राज्याच्या मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांसमोर हुर्यो उडवताना या कार्यकर्त्यांचे एरवी खुट्ट वाजलं तरी पेटून उठणारे स्वाभिमानी मुखवटे गळून पडले होते काय? आश्चर्याचा भाग म्हणजे झालेल्या प्रकाराबद्दल शिस्तशीर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंतप्रधानांकडून आणि साधनशुचितेच्या गप्पा मारणाऱ्या भारतीय जनता पक्षाकडून कारवाई तर दूरच, साधी प्रतिक्रिया सुद्धा आली नाही. म्हणजे ह्या सर्व गोष्टी पक्षाच्या आशीर्वादानेच होतात असे मानावे काय? 'त्या कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षाशी काहीही संबंध नव्हता' असं सांगून भाजप नेते मोकळे होतीलही, पण ते लोक होते हे एक उघड गुपित आहे. आपल्या विरोधी विचारांच्या व्यक्तीला, संघटनेला अथवा पक्षाला जाहिर सरकारी कार्यक्रमांत अपमानित करण्याची मस्ती ही या एकाधिकारशाहीतूनच आलेली दिसते. 
            दुसरी चिंतेची बाब जी साधारण गेल्या वर्ष-दिड वर्षांपासून जाणवते आहे ती म्हणजे मोदी समर्थकांचे सोशल मिडीयावरील वर्तन. मोदींच्या मतांच्या/धोरणाच्या विरोधी मत मांडणार्‍या,त्यांच्यावर टीका करणाऱ्या  पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्यांचा किंवा सामान्य माणसाचा अत्यंत हीन,घाणेरड्या प्रकारे अपमान केला जातो आणि यामधे ही 'मोदी आर्मी' कायम पुढे असते. 'मोदी आर्मी' हा शब्द अशासाठी की हा असा जाहिर, अपमानास्पद भाषेत उपमर्द करणाऱ्या काही बहाद्दरांना नरेंद्र मोदी ट्विटर वर त्यांच्या वैयक्तिक अकाऊंटमार्फत  (@narendramodi) फॉलोसुद्धा करतात. मत मांडणारा समोरचा माणूस आपल्यापेक्षा वयाने किती ज्येष्ठ आहे, तो ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रातला त्याचा अनुभव किती दांडगा आहे याचा अजिबात विचार न करता एकेरी उल्लेख करून त्याचा घाणेरड्या शब्दात अपमान करण्यात ही जमात अव्वल असते. अर्थतज्ज्ञांना अर्थव्यवस्था शिकवणारे आणि डॉ.विश्वंभर चौधरींसारख्या पर्यावरणाच्या क्षेत्रात अनेक वर्ष काम करणाऱ्या व्यक्तींना सरकारची चुकीची धोरणंच कशी योग्य आहेत हे सांगणारे महाभागही याच पंथातले असतात. ज्या प्रमाणे मोदी ट्विटर वर त्यांच्या समर्थकांना फॉलो करतात त्याप्रमाणे त्यांच्या समर्थकांच्या वाढत्या मग्रूरीला लगाम घालणे हीसुद्धा त्यांची जबाबदारी नव्हे काय?

          एकहाती, निरंकुश सत्तेच्या जशा चांगल्या बाबी समोर येत आहेत तशाच या वाईट बाबीही दिसून येत आहेत. 'आपली' माणसं सत्तेत आहेत म्हणजे आपल्याला स्वैर, बेलगाम वागण्याचा अधिकार मिळाला असा गैरसमज करून घेतलेल्यांचा हा समज दूर करण्याची गरज आहे. अहंकार, गर्व, माज या गोष्टींमुळे रसातळाला गेलेल्या अनेक व्यक्ती, सत्ता इतिहासात सापडतील. तेव्हा, मूळ संस्कृत वाक्यात थोडासा बदल करून 'सत्ता विनयेन शोभते' म्हणायला हरकत नाही.

0 comments:

Post a Comment